एक अध्याय संपला   

मडविकेट, कौस्तुभ चाटे 

रोहित शर्मा आणि विराट कोहली, दोघांनीही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आणि एका अर्थाने भारतीय क्रिकेटमधील एक अध्याय संपला. आपल्या ’फॅब ५’ च्या निवृत्तीनंतर ज्या महत्त्वाच्या खेळाडूंनी भारतीय क्रिकेटची धुरा वाहिली, त्यात रोहित आणि विराटचे नाव अग्रणी असेल. टी-२० क्रिकेटच्या उदयानंतर आणि भरभराटीनंतरही या दोन्ही खेळाडूंनी आपापल्या परीने भारतीय क्रिकेटचे, कसोटी क्रिकेटचे वैभव वाढवले आहे यामध्ये शंकाच नाही. रोहित आणि विराट, दोघांचीही कारकीर्द साधारण एकाच वेळी सुरु झाली, दोघांनीही भारतीय क्रिकेटची तीनही प्रकारांमध्ये सेवा केली, आणि दोघेही टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून एकाचवेळी निवृत्त होत आहेत. आज कसोटी क्रिकेटचे भवितव्य काय असेल ते सांगणे अवघड आहे, पण जेव्हा भारतीय क्रिकेटमधील ’कसोटी लिजंड्स’ची यादी केली जाईल, त्यामध्ये हे दोघेही नक्कीच असतील. 
 
एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात क्रिकेटने कात टाकली. एकीकडे एकदिवसीय क्रिकेट बदलत चाललं होतं, अधिक वेगवान होत होतं आणि दुसरीकडे टी-२० क्रिकेटने जगाला वेड लावायला सुरुवात केली होती. अशावेळी १८-२० वर्षांची ही पोरं त्या क्रिकेटकडे आकर्षित होणार हे कोणीही सांगितलं असतं. आणि झालं पण तसंच. २००७ च्या टी-२० विश्वचषक विजयानंतर  भारतात आयपीएल नावाचं वादळ आलं आणि त्यामध्ये सगळेच तरुण खेळाडू ओढले गेले. पण ज्या काही ठराविक खेळाडूंमुळे क्रिकेटच्या या सर्वात महत्त्वाच्या फॉरमॅटचं महत्व अबाधित राहिलं त्यामध्ये रोहित आणि विराट यांचं नाव अग्रस्थानी असेल. दोघांनीही संघाचा सर्वात महत्वाचा फलंदाज म्हणून वेळोवेळी आपली जबाबदारी पार पाडली, तसेच संघाचा कर्णधार म्हणून देखील ते योग्य वेळी, योग्य प्रसंगी ठाम उभे राहिले. 
 
एक ’मुंबईचा राजा’ आणि दुसरा ’दिल्ली का गुंडा’, पण दोघेही मैदानावर कायम तळ ठोकून उभे राहिले. अनेकवर्षे आपली जबाबदारी ओळखून, त्या प्रमाणे स्वतःला तयार करून आपले १०० टक्के योगदान देणे सोपे नसते. आणि सध्याच्या वेगवान जगात तर ते खचितच अवघड आहे, पण दोघांनीही आपापल्या परीने न्याय देत भारतीय क्रिकेटची सेवाच केली आहे. या दोघांनीही खेळाच्या शॉर्ट फॉरमॅट मध्ये (टी-२० अथवा एकदिवसीय क्रिकेट) अधिक चांगली कामगिरी केली आहे पण सध्याचा विषय आहे तो कसोटी क्रिकेटचा. त्यामुळे खेळाच्या या सर्वोच्च फॉरमॅट मधील त्यांच्या कामगिरीचा विचार होणे आवश्यक आहे. 
 
रोहित शर्माने मुंबईचे शालेय क्रिकेट गाजवायला सुरुवात केली होती. हळूहळू तो मुंबई संघाचा देखील भाग बनू लागला होता. तशातच २००७ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली. त्याच सुमारास भारताचा १९ वर्षांखालील संघाचा कर्णधार, दिल्लीचा विराट कोहली उदयास येत होता. त्याच्या संघाने १९ वर्षांखालील मुलांचा विश्वकप जिंकला होता. पण या दोघांचे कसोटी पदार्पण होण्यास काही काळ गेला. २०११ च्या जून महिन्यात वेस्टइंडीज विरुद्ध विराटने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले तर रोहित नोव्हेंबर २०१३ मध्ये संघात आला. दोघांचे कसोटी क्रिकेटमधले सुरुवातीचे दिवस अगदीच भिन्न होते. विराटला कसोटी क्रिकेटमधील पहिले शतक झळकावण्यासाठी ८ सामन्यांची वाट पाहावी लागली तर रोहितने पहिल्या २ कसोटींमध्येच २ शतके झळकावून आपले नाणे खणखणीत वाजवले होते. रोहितने मधल्या फळीतील फलंदाज म्हणून क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले आणि एक सर्वोत्कृष्ट सलामीचा फलंदाज म्हणून तो मोठा झाला. दुसरीकडे विराटने भारतीय फलंदाजीची मधली फळी सक्षम करण्यात आपली हयात घालवली. स्टेन असो अथवा स्टार्क, बोल्ट असो अथवा हेझलवूड आणि लायन असो अथवा ब्रॉड, दोघांनीही गोलंदाजांची तमा बाळगली नाही, अर्थात, जेम्स अँडरसन सारख्या दर्जेदार गोलंदाजाने दोघांनाही त्रास दिलाच, पण क्रिकेटच्या खेळाची तीच खासियत आहे. तुम्ही या खेळाचा आदर केला तर फलंदाज आणि गोलंदाज या दोघांनाही आपापल्या परीने या खेळावर राज्य करता येते, आणि रोहित-विराटच्या जोडीने कायमच क्रिकेटला न्याय दिला हे नक्की. 
 
रोहित कसोटी खेळायला उतरला तेव्हा तो एकदिवसाच्या  क्रिकेटमध्ये चांगला चमकत होता.आता हा कसोटी क्रिकेटमध्ये काय कामगिरी करतो याकडेच रसिकांचे लक्ष होते. पहिल्या दोन सामन्यांत दोन शतके झळकावून त्याने या प्रकारा साठी आपण तयार असल्याची चुणूक दिलीच. मुंबईचा  खडूसपणा त्याच्याकडे ठासून भरलेला होता. भारतीय उपखंडातील (प्रामुख्याने भारत आणि श्रीलंका) खेळपट्ट्यांवर तो दादा होताच पण इतर देशांमध्ये देखील त्याची बॅट चमकत राहिली. मधल्या फळीत चांगली कामगिरी करून देखील संघासाठी म्हणून सलामीला येण्याचे धाडस त्याने दाखवले. त्यानंतर त्याच्या बॅटने खोर्‍याने धावा केल्या. अर्थात त्यामागे एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटची पुण्याई होतीच. २०२१ मध्येइंग्लंडविरुद्ध चेन्नईमध्ये केलेल्या १६१ धावा कायम लक्षात राहाव्या. फिरकीला साथ देणार्‍या खेळपट्टीवर कसे खेळावे याचा जणू धडा होता तो. त्याची अजून एक आठवणारी खेळी म्हणजे २०२१ मधेच इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स वर केलेल्या ८३ धावा. त्याचे शतक हुकले पण त्या मैदानावर त्याने मारलेले फटके, गोलंदाजांवर चढवलेला हल्ला कायम लक्षात राहावा. त्याच्या बॅटिंगमधून कायम त्याची बेफिकीर वृत्ती जाणवायची. क्रिकेटचा कोणताही फॉरमॅट असो, रोहित त्याच्याच पद्धतीने खेळत राहिला. कसोटी कप्तान म्हणून तो यशस्वी ठरला का प्रश्न कदाचित पडू शकेल, पण २०२३ मध्येकसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम सामन्यापर्यंत घेऊन जाणारा कप्तान रोहित क्रिकेट रसिकांच्या कायमच लक्षात राहील. 
 
विराट आंतरराष्ट्रीय स्तरावर आला तो शॉर्ट फॉरमॅटचा खेळाडू म्हणूनच. कसोटी क्रिकेटमध्ये त्याला स्थिरावयाला थोडा वेळ गेला खरा पण ज्यावेळी त्याच्या बॅटने बोलायला सुरुवात केली, त्यानंतरची काही वर्षे त्याचीच होती. २०१४ ते साधारण २०१९ हा त्याच्या कारकिर्दीचा सुवर्णकाळ. या काळात तो म्हणेल तिथे आणि तो म्हणेल त्या पद्धतीने त्याच्या बॅटमधून धावा निघत होत्या. भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्टइंडीज आणि काही प्रमाणात इंग्लंडमध्ये देखील तो चमकत राहिला.आता काही काळातच तो क्रिकेटमधील सर्व रेकॉर्डस् मोडणार यावर क्रिकेट पंडितांनी शिक्कामोर्तब केले. कर्णधार म्हणून देखील तो यशस्वी ठरत होता. पण.... हा पण महत्वाचा असतो. 
 
त्याच्या बॅटला काय झाले माहित नाही, पण ती रुसली ती कायमचीच. भल्याभल्या गोलंदाजांना पाणी पाजणारा विराट अगदी साध्या गोलंदाजांच्या अतिशय सरळमार्गे येणार्‍या चेंडूवर बाद होऊ लागला. त्याचे पदलालित्य (फूटवर्क) चुकू लागले, तो आठव्या-नवव्या यष्टीवर येणारा चेंडू खेळण्याच्या नादात बाद होऊ लागला. एकूणच त्याचे तारे फिरत चालले होते. त्याचे क्रिकेट संपल्याचे हेच क्रिकेट पंडित निक्षून सांगू लागले. कोणत्याही मोठ्या खेळाडूच्या बाबतीत होते तेच झाले. विराट एका दुष्टचक्रात अडकला. एकदिवसीय आणि टी-२० मध्येही तो धडपडत होताच. पूर्वपुण्याईच्या बळावर अनेक गोष्टी घडत होत्या, आणि शेवटी तलवार म्यान करण्याची वेळ आलीच. पण विराटने कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या फलंदाजीने जो आनंद दिला आहे त्याचे वर्णन करणे अशक्य आहे. खास करून ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध त्यांच्या देशात खेळणारा विराट कायम लक्षात राहील. २०१४  मध्ये इंग्लंडच्या भूमीवर हतबल झालेला विराट पुढच्या मालिकेत फिनिक्स पक्षासारखा वर आला. त्याची हीच विजिगिषु वृत्ती क्रिकेट प्रेमीला खुणावत राहील. 
 
रोहित  आणि विराट , दोघेही मोठे खेळाडू. एक मुंबईच्या वडापाव साठी वेडा तर दुसरा फिटनेसचा विचार करत योग्य तोच आहार घेणारा. एक बेफिकीर वृत्तीचा तर दुसरा जिगरबाज. दोघांनीही मैदान गाजवलं. काही महिन्यांपूर्वी ते दोघेही टी-२० क्रिकेटमधून एकत्रच निवृत्त झाले, तर कसोटी क्रिकेटला देखील त्यांनी साधारण एकदमच रामराम ठोकला. पुढे काही काळ ते एकदिवसीय क्रिकेट खेळतील देखील, पण क्रिकेटच्या सर्वोच्च फॉरमॅटमध्ये मात्र आता ते दिसणार नाहीत. रुखरुख राहील ते विराटने १०००० आणि रोहितने ५००० धावांचा टप्पा गाठला असता तर, पण त्या रुखरुखीत देखील एक वेगळी मजा आहे. अर्थात रोहित आणि विराटने त्या रेकॉर्ड्सच्या पलीकडे कामगिरी केली आहे हे सांगणे न लागो. यापुढे पांढर्‍या कपड्यांमध्ये, लाल चेंडू खेळताना हे दोघे दिसणार नाहीत. खरोखर भारतीय क्रिकेटचा एक मोठा अध्याय संपला आहे  हे नक्की.

Related Articles